
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी. 26/01/2026 रोजी ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखर कळसूबाईवर ७७ फूट लांबीचा भारतीय तिरंगा फडकवून एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. या राष्ट्रभक्तीपूर्ण मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या २२ हून अधिक गिर्यारोहकांसह कळसूबाई येथील उपस्थित सुमारे १०० हून अधिक गिर्यारोहकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व नाशिकचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट राहुल बनसोडे, ‘आई सेंटर प्रो’चे संचालक प्रा. नागेश जोंधळे (अंबाजोगाई) तसेच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे (नंदुरबार) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनी हा विक्रम यशस्वीरीत्या साकारण्यात आला.कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकावल्यानंतर उपस्थित सर्व गिर्यारोहकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले तसेच राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून भारतीय ध्वजास मानवंदना दिली. राष्ट्रप्रेम, एकता आणि अभिमानाने भारावलेला हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.या वेळी ‘आई सेंटर प्रो’चे युवा समन्वयक प्रतीक गौतम, पल्लवी माने, इंग्लिश विंग्स प्री-स्कूलच्या प्राचार्या स्वाती वाकळे, राहुल घायमुक्ते, सुमित खोत, धम्मदीप वैद्य, श्रेया ढोले, यश जोंधळे, समर्थ साखरे, नयन जाधव, सक्षम वाघमारे, संजय कुमार यांच्यासह केवळ तीन वर्षीय आर्यांश जोंधळे याचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गिर्यारोहकांच्या उपस्थितीने हा उपक्रम केवळ विक्रमापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय एकात्मता, युवा नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रभावी प्रतीक ठरला.
