
त्र्यंबकेश्वर: प्रतिनिधी:-निलेश चव्हाण, दि.१३/०८/२०२६,रोजी.बेझे फाटा ते चाकोरे या प्रमुख जोड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या जीवघेण्या रस्त्यामुळे रोज वाहने आदळून सुटे भाग तुटत असल्याने वाहनधारकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच खड्डे चुकवताना छोटे-मोठे अपघात घडून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.या मार्गावरून रोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार ये-जा करतात. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या रस्त्याची वर्षानुवर्षे दुरवस्था कायम आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने आणखी मोठ्या अपघाताची वाट न पाहता रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तातडीने रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
