
प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर
दि.१६/०९/२०२६.रोजी,खैरगाव एका बाजूला डिजिटल भारताच्या आणि विकासाच्या गोष्टी केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे एका गावातील नागरिकांना आणि शाळकरी मुलांना करावी लागणारी कसरत ठरत आहे. तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाडी-वस्तीवर रस्ता नसल्याने आणि हिंस्र प्राण्यांच्या दहशतीखाली चिमुकल्यांना जीव मुठीत धरून शिक्षणासाठी जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम मंजूर होऊन तब्बल एक वर्षाचा काळ लोटला, तरीही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाची ही अनास्था संतापजनक आहे.
या मार्गावर ‘बिबट्या’ सारख्या हिंस्र प्राण्याचा वावर असून कायम भीतीचे वातावरण असते. असे असतानाही इयत्ता पहिली ते १० वीपर्यंतची शाळकरी मुले दप्तराचा पाठीवर बोझा घेऊन, पूर्ण पावसाळयाचे ४ महिने चिखल तुडवत शाळेत जातात.
प्रशासनाच्या तोंडाला कुलूप असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी काढली आणि श्रमदान करत रस्त्यावर खडी व मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली.
“प्रशासनाला या लाजीरवाणी परिस्थितीची चाड उरलेली नाही का? मोठ्या माणसांचे जाऊ द्या, पण या लहान-लहान लेकरांसाठी तरी प्रशासनान जातीने लक्ष घालून रस्ता बनवून द्यावा,” अशी आर्त आणि आक्रमक हाक संतप्त ग्रामस्थांनी दिली आहे.
उपस्थित स्थानिक रहिवासी श्री. गणपत भावडू रेरे, श्री. नवसु धोंडू हंबीर, श्री. यशवंत महादू शिद, श्री. सखाराम लक्ष्मण आघान, श्री. राघो नवसु हंबीर, श्री. सखाराम भगत, श्री. रितेश गणपत रेरे, कु. हर्षद अंकुश तोकडे, श्री. नवनाथ गणपत रेरे, श्री. महादू शिद, श्री. गोरख लक्ष्मण रेरे, आणि श्री. लहानु वाळू जाखेरे यांनी या संघर्षात पुढाकार घेतला.
या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मंजूर रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी आता स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ करत आहे.
